39 views
वडगाव मावळ दि.24 (प्रतिनिधी) “मी आमदार आहे, कारण तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात. आज निर्णय घ्यायचे असतील, तर तोही तुमच्या सल्ल्यानेच घ्यायचा,” असे स्पष्ट शब्दांत सांगत आमदार सुनील शेळके यांनी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका मांडली. वडगाव मावळ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ तालुकास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष संघटनेच्या सुदृढ बांधणीसाठी नवे संकेत दिले गेले. आमदार सुनील शेळके यांच्या सडेतोड भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. पक्षातील निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता, २० सदस्यीय समितीचा निर्णायक हस्तक्षेप, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन यामुळे हा मेळावा यशस्वी ठरला.
मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, गणेश आप्पा ढोरे, सुरेश चौधरी, विठ्ठल आण्णा शेळके, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, कृष्णा कारके, नारायण पाळेकर, तुकाराम आसवले, भरत येवले, सुहास गरुड, लक्ष्मण बालगुडे, नामदेव ठुले, प्रवीण झेंडे, विलास बडेकर, सुरेश धोत्रे, अशोक भेगडे, दर्शन खांडगे, साहेबराव कारके, संदीप आंद्रे, भरत भोते, जीवन गायकवाड, किशोर सातकर, रुपेश घोजगे, मारुती देशमुख, पंढरीनाथ ढोरे, बाबूलाल नालबंद, प्रकाश हगवणे, कांतीलाल काळोखे, भरत लिम्हण, सुवर्णताई राऊत शोभाताई कदम, पूजाताई दिवटे, कल्याणीताई काजळे,शबनम खान, तेजस्विनी गरुड, सुनीता कुडे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*संघटनात्मक आढावा व नियोजन*
या बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मैदानी पातळीवर कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय सुचविण्यात आले. संघटनात्मक बळकटी, कार्यपद्धतीतील सुधारणा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचे नियोजन या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणासाठी एकजुटीने अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
*शेळके यांचे ठाम विधान – “नेतृत्व नव्हे, निर्णय आता कार्यकर्त्यांचे”*
आमदार शेळके यांनी पक्षातील महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेसाठी २० जणांची समिती नियुक्त केली असून, "या समितीचा निर्णय मला देखील बंधनकारक असेल," अशी ऐतिहासिक भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले की गाव अध्यक्ष, उमेदवार निवड, निधी मंजुरी यासारख्या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांचा आवाज निर्णायक असेल.
*भाजपवर टीका करत ते म्हणाले*, “पूर्वी म्हणायचे – *तुम लढो, हम कपडे संभालेंगे*, आता म्हणतात – *तुम लढो, हम कॉन्ट्रॅक्ट संभालेंगे*… ही भूमिका आता सहन केली जाणार नाही.” त्यांनी भाजपमधील आपल्या ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, “भारतीय जनता पक्षात सामान्य कार्यकर्ता संपला आहे, पण राष्ट्रवादीत तो केंद्रस्थानी आहे,” अशी ठाम मांडणी केली.
*नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व संघटनात्मक विस्तार*
या मेळाव्यात खालील पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली –
सुवर्णा राऊत – महिला अध्यक्ष, मावळ तालुका
वर्षा नवघणे – ग्रामीण महिला अध्यक्ष
सुरेश धोत्रे– तळेगाव शहर अध्यक्ष
सुशांत बालगुडे – विद्यार्थी आघाडी अध्यक्ष
रवी पवार* – सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष
कुणाल आगळे– सामाजिक न्याय विभाग, तळेगाव शहर
निलेश टाक – सामाजिक न्याय विभाग, देहूरोड शहर
हरिश्चंद्र बगाड– आदिवासी सेल अध्यक्ष, मावळ तालुका
*संघर्षाला न्याय, संघटनेला बळ*
शेवटी आमदार शेळके म्हणाले, “माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही माझ्यासोबत होतात, आता मी तुमच्या मागे उभा आहे. कोणाला सरपंच करायचं, कोणाला नगरसेवक करायचं, हे सर्व निर्णय आता कार्यकर्त्यांच्या हाती आहेत. संघर्ष कमी करा, पण न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे.”
या मेळाव्याने मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीचे व राजकीय एकजुटीचे दर्शन घडवले.